मख़दूम समाचार
२७.९.२०२३
चला, आपण धाब्यावर जाऊ...
मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ...
धाब्यावर जाताच, मी म्हणालो,
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले "हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?"
मी विचारले सहजपणे,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले...
न्यायमूर्ती लोया नागपुरात,
नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
समोर मेन्यू कार्ड धरले...
शेतकरी आत्महत्या भागात,
दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?
मी विचारले कंटाळून,
अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
तुम्ही गिफ्ट काय घेणार ?
कंटाळून विचारले शेवटी मी,
९ वर्षांपासून लावलेल्या स्वप्नांची
रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
पत्रकारांची
ताडोबात ट्रीप कधी काढायची ?
आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो...
सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..
- हेरंब कुलकर्णी.
अहमदनगर, महाराष्ट्र
(कवी हे शिक्षक, लेखक व सामाजिक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आहेत)
إرسال تعليق