मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २३.९.२०२३
सावेडी येथील शिर्डीरोड म्हणजे मनमाड रोडवरील जिल्ह्यातील पहिल्याच सुरू झालेल्या कोहिनूर मॉलसमोर आज तिसऱ्या पावसात पुन्हा पाण्याचे तळे साचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. लुटारू पुढारी, लोभी बिल्डरलॉबी व भ्रष्ट प्रशासनाने शहरातील नैसर्गिक वाहते ओढेनाले नष्ट केल्यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी महामार्ग, रस्ते व विविध नागरी वसाहतींमधे घुसलेले दिसून येत आहे. रयत समाचारने याबाबत पहिल्या पावसाने कोहिनूरसमोर महामार्गावर पावसाचे पाणी साचून वाहनचालक व लोकांच्या उडालेल्या त्रेधातिरपटींबाबत ता. १६ एप्रिल २०२३ रोजी 'कोहिनूर मॉलसमोरील राज्य महामार्गावरील साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रहस्य काय ?' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त लिहले होते.
हे वृत्त वाचून जागे झाल्यवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाखो रूपये खर्च करत कोहीनूरच्या दारात पायघड्या टाकून सिमेंट पाईपलाईन टाकून मोठे चेंबर बांधून तात्पुरती डागडूची केली होती. महामार्गाच्या हद्दीतच पाईपगटर व चेंबर बांधल्याने ते जडवाहतुकीमुळे पुर्ण क्षमतेने काम करूच शकत नव्हते. ते कोणत्याही वेळी तुटूनफुटून गेले असते. आज तिसऱ्याच पावसाने सा.बां. विभागाचे पितळ उघडे उघडे पाडले आहे. आज पुन्हा कोहिनूर मॉलसमोर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे तळे साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या ठिकाणी काही वाहने पाण्यात बंद पडली होती. काही नागरिक बंद पडलेल्या दुचाक्या ढकलत पाण्याबाहेर काढत असल्याचे चित्र दिसत होते. भरपावसात नागरिकांची मोठी अडचण झाली होती.
संबंधित बातमी वाचा : 'कोहिनूर मॉलसमोरील राज्य महामार्गावरील साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रहस्य काय ?'
याठिकाणी महामार्गावर पुर्वी पावसाचे पाणी जाण्यासाठी छोटा चौकीपुल होता. तो भ्रष्ट प्रशासन लोभी बिल्डरलॉबीच्या कारनाम्यामुळे नष्ट केल्याने पावसाचे संपुर्ण पाणी महामार्गावर साचले होते. ते काढून देण्यासाठी थेट कोहिनूरच्या व आजूबाजूच्या लोकांना महामार्गावरील सिमेंट काँक्रिटचे दणकट दुभाजक (डिव्हायडर) तोडून काढावे लागले. डिव्हायडर तोडत असतानाची शुटींग घेण्यास रयतचे प्रतिनिधी गेले असता डिव्हायडर तोडणारांनी तेथून काढता पाय घेतला.
नैसर्गिक वाहते ओढेनाले विकासाच्या भस्मासुराने नष्ट केल्यामुळे पावसाचे पाणी महामार्ग, रस्ते व नागरी वसाहतीत घुसत आहे. त्यामुळे प्रशासनाने ओढेनाले नष्ट केलेले लेआऊट, बांधकाम मंजुऱ्या रद्द करून नैसर्गिक वाहते ओढोनाले पुर्ववत करावेत, अशी रयत परिवारची मागणी आहे.
إرسال تعليق