अहमदनगर - भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर ज्या घडामोडी घडत होत्या त्यावर मौलाना आजाद यांची करडी नजर होती आज घडणार्या कोणत्या बाबींचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे ते समजून होते. देशाच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध दर्शविला होता व तो शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांनी इतर नेत्यांनाही फाळणी न करण्याची विनंती केली होती. पण शेवटी जे नाही घडायला पाहिजे होते ते घडलेच देशाची फाळणी झाली व देशात दंगली उसळल्या. माणूस माणसाकडे माणूस नाही तर जात म्हणून बघायला लागला हे मौलानांना सहन होत नव्हते. लोकांना शांत करण्यासाठी त्यांच्या मनातील फाळणीच्या दु:खाला व देशात पसरलेल्या दंगली व जातीवादाला संपविण्यासाठी मौलाना आजाद यांनी भरपूर प्रयत्न केले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्या वतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर भुईकोट किल्ल्यात दोन वर्ष मौलाना आझाद बंदिस्त असलेल्या खोलीमध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ महबूब सय्यद, मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष अभिजीत वाघ, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सरुर, सल्लागार माजी मुख्याध्यापक शरफुद्दीन शेख सर, राजूभाई शेख, डॉ. शमा फारुकी, अमोल बास्कर,आसिफ सर, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील, सचिव निसार बागवान, वहाब सय्यद, आर्कि. फिरोज शेख, अमिन धारानी, प्रा. डॉ. जब्बार पटेल, सरफराज शेख, इंजि. मोहम्मद अकील, मुबीन शेख, अनंतराव गारदे, एड. सुरज खंडीझोड, आरिफ प्लंबर, इस्माईल शेख, कलीम शेख, सलीम सहार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी सांगितले की मागील काही वर्षापासून आलेल्या नवीन सरकारने जातीयवाद च्या भावनेतून मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव जयंती पुण्यतिथीच्या जीआर मधून कमी केलेले आहे. ही देशासाठी फार शोकांतिकेची बाब असून मागील 70 वर्ष सत्तेत असणाऱ्या पक्षांनी यावर आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले.
प्राध्यापक डॉ महबूब सय्यद यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा भारताच्या स्वातंत्र्यांमध्ये असलेला सहभाग व देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत उहापोह केला. व देशाची फाळणी नाही व्हावी. यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी किती प्रयत्न केले. याचे त्यांनी अनेक उदाहरणं सांगितली.
रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज जातीवादाची भावना समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की जातीच्या आधारावर दुकानांमधून खरेदी विक्री करण्याचे एकमेकाला समाज आवाहन करतात. अशा वेळेस संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण प्रत्येक दुकानात संविधान वाटून चिटकवले पाहिजे.जीथे संविधान चिटकवलेले असेल तिथूनच खरेदी करावं असं आपण पर्याय जातीवादी शक्तींना दिला पाहिजे असे सांगितले.
माजी मुख्याध्यापक शरफुद्दीन शेख म्हणाले की शाळा व महाविद्यालयाचे स्तरावर मुलांमध्ये स्वतंत्रता सेनानीं बद्दल व्याख्यानाद्वारे वर्षभर नियमित वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला आपल्या स्वातंत्रता सेनानींबद्दल माहिती होऊ शकेल.
डॉ कमर सुरुर, डॉ शमा फारुकी व आसिफ सर यांनी आपल्या शेर शायरी तून भावना व्यक्त केल्या.
إرسال تعليق