शेवगाव दि 27--- 'शालेय विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासात माय मराठीचे अनन्य साधारण महत्व असून निबंध लेखन ही उद्याचे साहित्यिक घडण्याची पहिली पायरी ठरू शकते', असे प्रतिपादन कवयित्री स्वाती राजेभोसले यांनी केले.मराठी राजभाषा दिनानिमित्त शब्दगंध साहित्यिक परिषद, शेवगाव शाखेने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तर निबंध लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब गवळी होते. शब्दगंधच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र नजन, कार्यकारिणी सदस्य वैभव रोडी, सचिव सुरेश शेरे,कविवर्य विठ्ठल सोनवणे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संतसाहित्य, मराठी भाषेचे वैभव आणि सध्याची परिस्थिती यांचा आलेख मांडला.
निबंध स्पर्धेत आर्यन अडकित्ते याला एक हजार रुपयांचे प्रथम, स्वराली मकासरे हिला सातशे रुपयांचे द्वितीय तर अमृता हरवणे हिला पाचशे रुपयांचे तृतीय पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ऋतुजा मोटकर, सृष्टी शेळके, गौरव लांघे, श्रावणी पुंडे, निशा प्रजापती यांना प्रत्येकी दोनशे रुपये उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रास्ताविक हरिश्चंद्र नजन यांनी तर सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख उमेश घेवरीकर यांनी केले.विजेत्यांचे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment