मख़दूम समाचार
अहमदनगर (विजय मते) २२.८.२०२३
विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन त्यादृष्टीने अभ्यास करावा. बुद्धीबळसारख्या खेळामुळे अडचणींवर मात करुन आपली ध्येयपूर्ती कशी साधावी याचे शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादीत वापर केला पाहिजे व पुस्तकांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. मन व आरोग्य आबाधित ठेवण्यासाठी मैदानी खेळही खेळले पाहिजे, योग- ध्यान-धारणा केल्यास आपले मानसिक शारीरिक आरोग्य अबाधित राहते. डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कला-गुणांना वाव देण्यासाठी केलेले स्पर्धेचे आयोजन कौतुकास्पद असेच आहे. विद्यार्थी सर्वच क्षेत्रात सक्षम होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राहुरी कृषि विद्यापीठाचे डॉ.महावीरसिंग चौहान, क्रिडा अधिकारी डॉ. दिलीप गायकवाड, संस्थेचे विश्वस्त अॅड.वसंतराव कापरे आदि उपस्थित होते.
विश्वस्त कापरे म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कायम विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. राज्यस्तरीय स्पर्धेनिमित्त विचारांची आदानप्रदान होण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या ध्येयपुर्तीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.
या स्पर्धेमध्ये कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव आणि अहमदनगर अशा १० जिल्ह्यातील ६७ कृषि व कृषि संलग्न महाविद्यालयाचे बुद्धीबळपटू स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे यांनी खेळाडूंचे स्वागत करुन महाविद्यालयाचा क्रिडा अहवाल व सोयीसुविधां विषयी माहिती दिली. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे प्रभारी सचिव तथा संचालक डॉ.पी.एम.गायकवाड , उपसंचालक (तंत्र) प्रा.सुनिल कल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
Post a Comment