मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २३.९.२०२३
राज्य सरकारचा समूहशाळेचा निर्णय म्हणजे इतिहासाची चाके उल्टी फिरवण्याचा प्रयत्न असून एका अर्थाने फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारांचा हा पराभव आहे. अशी जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील १४,७८३ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. बंद करण्यात येणाऱ्या सर्व शाळा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील आहेत. 'सर्वांसाठी शिक्षण' या उद्देशाने डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यु.पी.ए. सरकारने शिक्षणाचा अधिकार कायदा (आर.टी.ई.) आणला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ शिक्षणाची सुविधा निर्माण झाली.
पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वीही राज्यातील बहुजन, ओबीसी व मागास समाजाला शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम केले. मात्र सध्या राज्यात अस्तित्वात असलेले सरकार हे इतिहासाची चाके पुन्हा उल्टी फिरवण्याचा प्रयत्न करीत आहे. एका अर्थाने फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचा ठरवून पराभव करण्याचे हे कारस्थान आहे.
बहुजन समाज, ओबीसी, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, हा भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा असुन त्यानुसारच हा निर्णय घेतला गेला असण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील बहुजन, ओबीसी, अल्पसंख्यांक नेत्यांनी याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असून समाजातील जाणकारांनी देखील याविरुद्ध आवाज उठविणे आवश्यक आहे. खरे तर शिक्षण विभागावर अधिक निधीची तरतूद करण्याऐवजी समूहशाळा निर्माण करण्याच्या माध्यमातून शाळा बंद करुन शिक्षकांची पदे कमी करण्यात येणार आहेत.
राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा, ओबीसी आरक्षणाच्या गोंधळाच्या स्थितीत राज्य सरकारने समूहशाळेचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा सरकारला मोठ्या सामाजिक उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विनायकराव देशमुख यांनी दिला आहे.
Post a Comment