मख़दूम समाचार
अहमदनगर (विजय मते) २३.९.२०२३
ऋषीपंचमी हा दिवस शुद्धीकरण आणि प्रायाश्चित पाळण्याचा असतो. या दिवशी ऋषींना स्मरण करुन त्यांच्याप्रती समाजात चांगले काम करुन अध्यात्मिक, विविध क्षेत्रात योगदान देऊन समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे एकव्रत आहे. ते व्रत जोपासत ऋषीतुल्य व्यक्तींचा आदर करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अहमदनगर सनातन धर्मसभा उपाध्यक्ष वेदमुर्ती महेश रेखे यांनी केले.
ऋषीपंचमी निमित्त गायत्री मंदिरात अहमदनगर शहरातील नामवंत, ज्येष्ठ ऋषीतुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी वेदमूर्ती महेश रेखे, अहमदनगर सनातन धर्मसभा शाखेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक, उपाध्यक्ष डॉ.नंदकिशोर मुळे, निळकंठ देशमुख, दिनकर देशमुख, ॲड.उमेश नगरकर, रमेश देशपांडे, उमेश वाळूंजकर, गिरिष मुळे, अनंत देशपांडे, सुरेखा देशपांडे, गणेश वैकर व सत्कारमुर्ती उपस्थित होते.
रेखे पुढे म्हणाले, अहमदनगर सनातन धर्मसभेचे ११७ व्या वर्षात पदार्पण होत आहे. हा वटवृक्ष चांगलाच मोठा झाला आहे. सर्वांनी चांगले काम करत शाखेला दृढता, बळकटी आणली आहे. सर्वसामान्य लोकांनी सनातन धर्मसभेस तन-मन-धनाने सहकार्य केल्याने वैभवशाली अशी धर्मसभा झाली, याचा आनंद आहे.
यावेळी महेश रेखे व दत्तोपंत पाठक यांचे हस्ते १० ऋषीतुल्य मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. श्रीगोपाल धूत, डॉ.सुधा कांकरिया, कुमुदिनी बोपर्डीकर, श्रीकृष्ण जोशी, सुरेश देशमुख, मोहन लुल्ला, प्रकाश गटणे, केंद्रे महाराज, जनार्दन वाळूंजकर, मोहन नातू यांचा समावेश होता.
प्रास्तविकात दत्तोपंत पाठक यांनी सांगितले की, १९७० ला मी धर्मसभेचा सदस्य झालो. माझी कार्यक्षमता व धर्मसभेचे काम पाहून आता अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना अनेक चांगले उपक्रम राबविले. यावेळी सत्कारमुर्ती प्रसिद्ध उद्योजक, डॉक्टर, संगीत विशारद यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सनातन धर्मसभेच्या अहनदनगर शाखेच्या कार्याचे कौतुक केले. धर्मसभा उपाध्यक्ष वेदमूर्ती महेश रेखे यांच्या निवडीमुळे अहमदनगरचे नाव उंचावले असे केंद्रे महाराज यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर देशमुख यांनी केले तर निळकंठ देशमुख यांनी आभार मानले.
Post a Comment